नांदेड : शेतीतील कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यातच वाढत्या महागाईने मजूरी व चाऱ्याचेही दर वाढले. त्यामुळे दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटतो. परंतु, नायगाव आणि बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्कल लावून यासंकटावर सहज मत केली आहे. एकाने दुचाकीला तर दुसऱ्याने ट्रक्टरला अवजार लावून कोळपणी केली आहे. मनुष्यबळासह खर्चाची ही बचत झाली असून त्यांचा हा देशी जुगाड सगळ्यांनाच फायद्याचा ठरणार आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन , सहा , व नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते , यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते. कोळपे हे खूप लहान अवजार असल्याने एका बैलजोडीच्या सहाय्याने तिन किंवा चार कोळपी चालविता. परंतु वाढत्या महागाईने व मनुष्यबळ मिळत नसल्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
नांदेडच्या कृष्णूर गावातील बालाजी जाधव यांनी मोटारसायकलीच्या मदतीने कोळप यंत्र बनवले आहे. बैलांच्या मदतीने कोळपणी करताना वेळ आणि अधिकचा पैसा खर्च होत असल्याने जाधव यांनी स्वतःच हे देशी जुगाड तयार केला आहे. या मोटारसायकलीच्या माध्यमातून कोळपणी करत जाधव आपल्या शेताची निगा राखत आहेत. त्यांनी तयार केलेले हे देशी जुगाड पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. यासाठी अवघा साडे तीनशे रुपये खर्च अल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच हेच काम, औताच्या सहायाने करण्यासाठी चार जण लागतात. मात्र, दुचाकीच्या सहाय्यक केल्या दोनच माणसे लागत, असून बैलाचा चारा पाणी व चार जणांची मजूरी वाचते. शिवाय एका वेळी चार एकर रान कोळपते, असे शेतकरी जाधव म्हणाले. बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथील शेतकरी जीवन पाटील यांनी ट्रॅक्टरला कोळपणी यंत्र जोडले आहे. त्यातून अवघ्या एक लिटर डिझेलच्या इंधनातून दोन एकर क्षेत्रातील कोळपणी होत आहे. वेळेसह श्रमाची बचत करणारे हे देशी जुगाड सध्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरले. अवघ्या काही रुपयांच्या खर्चातून शेतकऱ्याने हे देशी जुगाड यशस्वी करून दाखवले आहे.